Tuesday, November 12, 2013

मदन आणि यम

कुठेतरी ऐकलेली कथा आहे....
एकदा यम (म्रुत्यु देवता) कामासाठी एका वनात फिरत होते. फिरता फिरता खूप उशीर झाला.
यम देवता दमून विश्रन्ती साठी एका गुहेमध्ये गेले. झोपण्या आधी त्यानी आपला धनुष्य बाण काढून ठेवला. आणि ते झोपी गेले.
योगायोगानी त्याच वेळी मदन (प्रेम देवता) त्या गुहेत आल्या. अन्धार असल्यामुळे झोपलेले यम महाराज मदनाला दिसले नाहीत. मदनाने सुद्धा आपले धनुष्य बाण काढून ठेवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी यम घाईघाईनी गुहेतून बाहेर पडले. आणि चुकुन जाताना आपले काही बाण गुहेत विसरले आणि त्याऐवजी काही बाण मदनाचे घेतले.
काही वेळानी मदन सुद्धा उठले आणि शिल्लक राहीलेले बाण घेउन बाहेर पडले..
ह्या दोन्ही देवतानी केलेल्या ह्या घोळाची शिक्षा मात्र आपण मनुष्य भोगतो आहोत.......... कसे काय??
हेच बघा ना... जगात किती तरी तरुण अगदी कमी वयामध्ये मदनानी उचललेला चुकीचा बाण लागून मरण पावतात.
आणि या उलट यमाचे चुकीचे बाण लागल्यामुळे कितीतरी म्हातार्‍याना म्हातारचळ लागून ते कामातूर होतात.

Thursday, August 8, 2013

वळव्याचा पाऊस

नभात ढग दाटून आलेले
पहिल्या पावसाचे
कदाचित ते असावेत
वळव्याच्या पावसाचे
वळव्याचा पाऊस म्हणजे
बरसला तर जोमाने
नाहीत जाईल विरून वाऱ्याने
तुझे प्रेम ही असेच
वळव्याच्या पावसासारखे
बरसला तेव्हा मला चिंब चिबं
भिजवले…
जाताना मात्र माझे आभाळ मोकळे
ठेवूनच गेला…    

Monday, July 1, 2013

मनाची घुसमट

जगात असे कोणतेच अपयश नाही जे माणूस पचवू शकत नाही, पण त्या अपयशाला जग हसेन म्हणून तर माणुस आत्महत्या करतो.
*********

वासना ही ह्या वयात एका विस्तवाप्रमाणे मनात जळत असते त्याला थोडी जरी फुंकर मिळाली तर त्याचा वणवा पेटायला वेळ लागत नाही. त्या वणव्यात त्याच्या आयुष्याची क्षणात राख होऊ शकते.  

*************

शिक्षण हाच एक पर्याय आहे या गरिबीत माखलेल्या संसारातून उभारी घेण्याचा. 

**************

 त्याच्या खूप काही मागण्या नाहीत फक्त अन्न ,निवारा आणि आरोग्य एवढ्याश्या मागण्या आहेत. प्राथमिक गरजांसाठीच त्याची धावपळ सुरु असते. 
 
**************

कुणाचा वेश्या म्हणून स्वीकार करणे सोपे पण कुणाचा बहीण म्हणून सांभाळ करणे फार कठीण.

**************


वेगवेगळ्या वयाच्या मुलांचे मतप्रवाह :
बालपण : ह्या जगात आपल्या पालकां शिवाय कोणी शक्तिमान नाहीच.
किशोरवय : ह्या जगात आपल्या पालकांशिवाय कोणीही संकुचित नाही. कधी स्वातंत्र्य देतच नाहीत.
तरुणपण : ह्या जगात आपल्या पालकांशिवाय कोणीही वेडपट नाही. कधी मनासारखे करियर करू देत नाहीत.
म्हातारपण : आपल्याला आपल्या पालकांनी जेवढा वेळ दिला तितका वेळ आपण आपल्या पाल्यांना देऊ शकलो नाही . 



**************

मनात खूप दिवसापासून एक विचार घोळत आहे , गळफास घेऊन माणूस कसा मरत असेन. फासावर लटकलेल्या माणसाला आयुष्याच्या वेदना त्या मरणाच्या वेदनांपेक्षा जास्त असह्य कश्या वाटल्या असतील. कधी कधी वाटते आपण हि असा प्रयत्न करून पहावा पण तो प्रयत्न यशस्वी झाला तर ? ह्या भीतीने हा विचार मागे पडतो.


**************

प्रत्येकाच्या वागण्यामध्ये काही तरी कारण हेतू असतो जो पर्यंत आपण तो हेतू जाणून घेत नाही तो पर्यंत आपण त्याच्या वागण्याबद्दल काही आक्षेप घेऊ शकत नाही. प्रेमाने खूप काही मिळवता येते समोरच्या व्यक्तीच्या मनातील एक एक कप्पे फक्त प्रेमानेच खुले होतात. 


**************
 
लग्न म्हणजे फक्त व्यवहार किंवा सोहळा नाही. लग्न म्हणजे कुणी कुणाचा कब्जा मिळवणे नसते तर एकमेकांच्या स्वाधीन होणे असते


**************

मी नास्तिक आहे पण फक्त माझ्या चांगल्या काळात. वाईट काळात माझे देखील पाय नकळत मंदिराच्या पायऱ्या चढतात आणि त्या दगडाच्या मूर्ती समोर हात जोडले जातात.


**************

वाट चुकलेले वासरू एक तर आपल्या प्रवासामध्ये एखाद्या अनोळखी ठिकाणी जाऊन हरवते किंवा वाट शोधण्यातच आपले आयुष्य संपवून टाकते. मला देखील थोडे असेच वाटतेय.


**************

मी अगदी निर्लज्ज आहे, कारण लाज बाळगावी असे कामच मी मुळात करत नाही.


**************

माणूस मृत्यू पेक्षाही कशाला जास्त भीत असेन तर तो समाजाला , म्हणून तर कधी कधी तो समाज काय बोलेल ह्या भीतीने मृत्यूला जवळ करतो.


**************

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते पण मला तर वाटते आपण सर्व जण शेवटपर्यंत मातीचे गोळेच असतो फरक एवढाच लहानपणी आकार देणारे हात दुसऱ्यांचे असतात नंतर मात्र आपणच आपल्याला आणि आपल्या विचारांना आकार द्याचा असतो.


**************

प्रेमात पडणं काही गुन्हा नव्हे ..पण प्रेमासाठी गुन्हा?
प्रेम म्हणजे उदात्त भावना वगैरे ठीक आहे.
पण काही प्रेमविव्हळ मजनू मात्र लैलाच्या चैनीखातर नाहक स्वत:वर गुन्हेगारीचा स्टॅम्प मारून घेतात. अगदी आनंदाने.
निवांत गप्पा मारायला महागड्या कॉफीशॉपमध्ये जा. तिथे पदरमोड ठरलेलीच.
उंची भेटवस्तू देणं म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग, असाही काहींचा गैरसमज.
प्रेमात पडणं गुन्हा नाही; पण प्रेमासाठी गुन्हा करणं मात्र बिल्कुल गलत.
 
 
 
 
 
 
 


**************
 
प्रेम प्रेम म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घ्याची गरज आली आहे असेच वाटतेय. आज कोणी जर बोलले हि माझी प्रियसी आहे तर लगेच मित्रांचे वाक्य असते काय लेका काही केले आहे कि नाही आरे कमीत कमी कीस तरी घ्यायचं यार. प्रेम हे इतकेच आहे का? शरीराची ओढ ही एक प्रेमातील छोटीशी गोष्ट आहे पण आजकाल केले प्रेम केले जाते ते फक्त शरीराच्या ओढीनेच. आणि ती प्रत्येक वेळी ती बदलत असते.भावनिक प्रेम हे शिल्लक आहे का कोठे आता? वासना ही अमर्याद आहे. 


**************

Sunday, June 23, 2013

एकटे फूल


बागेच्या त्या कोपऱ्यात
रोपट्यावर उमलेले एकटे फूल
सुगंधाने, सौंदर्याने आपल्या
किती तरी भुंग्यांना वेड लावते
एकटेपणात जपत होते सौंदर्या आपले

एकटेपणा घालवण्यासाठी ती सुद्धा
भुलली असेन काही सुंदर भुंग्यांना
भुलाण्यामध्ये ती विसरून गेली असेन
भुंग्यांची साथ मात्र काही क्षणाची
असेन जोवर सुगंध तोवरच
घालतील घिरट्या भोवती
जाता सोडून सुंगंध जातील दुसऱ्या फुलांकडे

हवा होता तिला एक सोबती अशा
गळणाऱ्या आपल्या पाकळ्या
त्याच्या उराशी धरणारा
निर्माल्य झालेले फूल जपून ठेवणारा
सुगंध, सौंदर्याशिवाय मला आपलेसे करणारा
कदाचित माझ्यात तिला तो दिसला असावा
कदाचित माझ्यात तिला तो दिसला असावा

Friday, June 7, 2013

अपूर्ण प्रेम


मला निसर्ग फार आवडतो कारण तिला तो खूप आवडायचा. ती नेहमी म्हणायची प्रेम असावे तर या निसर्गासारखे चिरंजीव, निरागस  आणि निस्वार्थ. माणसाने किती ही हस्तक्षेप केला कितीही त्रास दिला तरी हा निसर्ग प्रेम करतच असतो. कधी कधी माझ्यासारख्या हट्टी प्रियसी सारखा रुसून ही बसतो मग सगळीकडे दुष्काळ पडतो आणि आपल्या प्रियकराच्या डोळ्यांतून मात्र बरसत राहतो. नवरा बायको मध्ये कडाक्याचे भांडण व्हावीत आणि बायकोने सोडून माहेरी जाण्याची धमकी द्यावी तसा हा निसर्ग पण कधी कधी आपले रुद्र रूप दाखवतो मग येतो तो भूकंप किंवा सुनामी. जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा खरे तर आकाश रडत असते दुखात आपल्या सख्याची या ढगांची काही क्षणाची साथ आता सुटणार म्हणून. मला तिचे हे प्रेमाचे गणित कधी कळतच नसे. मी फक्त तिच्या टपोर डोळ्यात माझेच प्रतिबिंब पाहत असे.

नदीकिनारी बसून पाण्यात दगड मारण्याची तर तिला फार हौस. पाण्यात दगड मारल्याने पाण्यावर उठणारे ते तरंग पाहण्यात ती अगदी गुंग होऊन जाई. ते पाण्यावर उठणारे तरंग किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत नाहीसे होत जात, मग मात्र ती उदास होत असे. मला अगदी बिलगून बसे आणि विचारी "विजय तू पण मला सोडून असाच नाहीशा होणार का रे ? आपले प्रेम किनाऱ्यापर्यंत पोहोचणारच नाही का ? देव अश्या जोड्याच का बनवतो त्या कधीच न जुळणाऱ्या?" मी मात्र तिची खोटी समजूत काढत असे "मी पाण्यावरचा तरंग नाही नाहीशा होणारा. मी तुझा शरीराने नाही झालो तरी मनाने तुझाच ग असेन सखे."

अजूनही मी  या नदीशी बोलत राहतो. तीच एक उरली आहे आमच्या प्रेमाची साक्षीदार.

तुझ्या किनारी कितीदा
तिला मी भेटायचो
तिच्या मिठीत सर्वस्व
मी हरवून जायचो
कोमल तिच्या स्पर्शाने
अंग माझे फुलायचे
तिच्या माझ्या चुंबनाने
तुझ्यातील मासे किती लाजायचे
अशा किती गोड आठवणीची
साक्ष तू व्हायची

आज मात्र आलो मी एकटाच
तुझ्यात मिसळून जायला
दुरवर तिच्यापासून
सांगत होतीस तू मला
पोरगी म्हणजे माझ्यावरून
वाहणारी शीतल हवा
देऊन जाते क्षणभर गारवा
शेवटी उरते फक्त जाणिव तिची

पावसाळ्यात हिरवळी ने नटलेले डोंगर त्यावरून वाहणारी शीतल हवा तिला फारच मोहिनी घालत. दर पावसाळ्यात ती मला हट्ट करी गावाच्या वेशीवरील टेकडी वर जाण्याचा. त्या टेकडीवर वाहणारी शीतल हवा तिला माझ्या जवळ खेचत होती. माझ्या मिठ्ठीत ती सुखावून जात असे. पावसाळ्याच्या एक दिवशी अशीच माझ्या मिठ्ठीत डोळे मिटून स्वप्न पाहत होती. स्वप्नात ती समुद्रकिनारी मावळतीचा सुर्य पाहत होती. क्षितिजावर तो लाल गोळा पाण्याला चिकटला होता. आकाशात केशरी रंगाची उधळण सुरु होती. तो  मनमोहक नजराणा ती आपल्या डोळ्यात साठवून घेत होती. सुर्य अर्धा पाण्यामध्ये बुडाला होता इतक्यात तिच्या समोर मी येतो. तिला तो सूर्यास्त पहायचा असतो पण तिच्या आड मी येत होतो. तिचा राग अनावर होत होता. ती अशी रागावते तेव्हा अधिकच सुंदर दिसते म्हणून मी पण तिच्या समोरून दूर होत नव्हतो. तिला आता माझ्यापेक्षा तो सुर्यास्तच जास्त प्रिय होता. तिने मला दूर ढकलले आणि इतक्यात एक भयाण लाट येऊन मला घेऊन जाते. ती दचकुन विजय नको जाऊस ना मला सोडून म्हणून अजून घट्ट मिठ्ठी मारते. ती स्वप्नातून बाहेर पडून माझ्या डोळ्यात एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी तिला जवळ घेतले आणि विचारले काय झाले सोन्या? ती बोलली स्वप्नात तू मेलास. मी बोललो "आपण कधीच मरणार नाही, आपल्याकडे अमृत आहे."  तिने मानेनेच विचारले  "कोठे?"  मी तिचे उत्तर माझ्या ओठांनी तिच्या ओठांवर दिले.              

आज ती माझ्या सोबत नाही पण तिच्या आठवणी अजून हे मनात ताज्या आहेत. दिवसभर कामात स्वतःला गुंतवून ठेवतो पण सूर्य मावळतीला लागला कि,  जशी आकाशात चादण्यांची गर्दी होते तशी मनात तिच्या आठवणी दाटून येतात. तिला देखील माझ्या आठवणी छळत असतील. आम्ही जवळ आलो होतो ते दूर जाण्यासाठीच. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टी मध्ये फक्त ती दिसते. ती मला भेटली होती काही काळासाठी फक्त,  हे दोघांना माहित असताना ही खूप प्रेम केले आम्ही एकमेकांवर. आज ती दुसऱ्याची आहे शरीराने पण अजून ही मनामध्ये मीच आहे. हा समाज मुलींना एकटे जगू देत नाही, नाहीतर ती सुद्धा माझ्यासारखी अशीच एकटी माझ्या आठवणीमध्ये जगली असती. अजूनही कधी भेटली तर एकच सांगते तू पण लग्न कर. लग्न म्हणजे मला तर जुगारच वाटतो त्या पेक्षा चांगल्या कामात आयुष्य घालवलेले बरे नाही का?  

आज मनाला किती खिन्न वाटते
आठवणीचे मोहाळे मनातून उडू पाहते
भावनांच्या नद्या डोळ्यातून वाहू लागते
असंख्य ताऱ्यातून प्रेमाचाच तारा निखळू लागतो
जसा सुगंध जातो सोडून फुलातून
तशी तू मला सोडून जाते
आज मनाला किती खिन्न वाटते